गाव विकास समिती आयोजित छत्रपती संभाजी महाराज जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर

देवरुख : गाव विकास समिती आयोजित छत्रपती संभाजी महाराज जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून विनया शैलेश जाधव (म्हाबळे) हिने पहिला, तर ऐश्वर्या दिनेश शिंदे (लांजा) हिने दुसरा क्रमांक पटकावला आहे.
गाव विकास समिती रत्नागिरी जिल्हा संघटनेमार्फत संघटन प्रमुख सुहास खंडागळे, अध्यक्ष उदय गोताड, उपाध्यक्ष राहुल यादव, मंगेश धावडे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी रत्नागिरी जिल्हास्तरीय छत्रपती संभाजी महाराज निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी या निबंध स्पर्धेसाठी ‘कोकणातील धार्मिक सलोखा – एक आदर्श’, ‘निवडणुका आणि कोकणातील विकासकामे’ हे विषय ठेवण्यात आले होते. या स्पर्धेला जिल्ह्यातील तरुण व विद्यार्थी वर्गाने उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला.
स्पर्धेचा निकाल संघटनेमार्फत जाहीर करण्यात आला असून यामध्ये सुहास तानाजी गेल्ये (शिवने), जयंत गोपाल फडके (पूर्णगड), सायली संदीप गुरव (आंगवली) यांना उत्तेजनार्थ बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. स्पर्धेच्या परीक्षक म्हणून संघटनेच्या महिला अध्यक्षा सौ. दीक्षा खंडागळे-गीते व उपाध्यक्ष सौ. अनघा कांगणे यांनी काम पाहिले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गाव विकास समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली. स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना गाव विकास समितीमार्फत देवरुख येथे बक्षीसे वितरित केली जाणार आहेत.



