
रत्नागिरी : थर्टी फस्ट साजरा करताना कुणीही दारू पिऊन वाहने चालवू नये. रत्नागिरी जिल्ह्यात नाकाबंदीच्या ठिकाणी सर्व वाहन चालकांची ब्रेथ ॲनालाझरच्या माध्यमातून तपासणी केली जाणार आहे. कुणी दारू पिऊन वाहन चालवताना आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिला आहे.

थर्टी फस्ट साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक रत्नागिरी जिल्ह्यात येत आहेत. त्यापार्श्वभूमीवर पोलीस दलही सज्ज झाले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पर्यटकांना काही सूचना केल्या आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले की, थर्टी फस्टच्या दिवशी समुद्र किनारी कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी आम्ही बंदोबस्त तैनात ठेवला आहे. त्याकरिता आम्ही सागरसुरक्षा रक्षक, मच्छिमार आणि स्थानिक ग्रामस्थांची मदत घेणार आहोत. समुद्र किनारी जाताना समुद्र खोलीचा अंदाज घ्या. कोणताही आततायीपणा करू नका. अशाच चुकांमुळे समुद्र किनाऱ्यावर दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

दारू पिऊन कुणीही वाहन चालवू नका. दारू पिऊन वाहन चालविल्याने अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे थर्टी फस्ट साजरा करताना दारू पिऊन वाहन चालवू नका असे आवाहन करतानाच थर्टी फस्ट साजरा करताना दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. नाकाबंदीच्या ठिकाणी ब्रेथ ॲनालायझरने वाहन चालकांची तपासणी होणार आहे. दारू पिऊन वाहन चालवताना कुणी आढळल्यास कठोर कारवाई होणार आहे, असा इशाराही पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी दिला आहे.

दरम्यान, रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विविध उपाययोजना करण्यात आल्या असून, समुद्र किनाऱ्यांवर सूचना देणारे फलक लावण्यात आले आहेत.



