टँकरच्या धडकेत निवळीतील तरुणाचा मृत्यू
हातखंबा दर्ग्याजवळ झाला अपघात : टँकर चालक ताब्यात

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील रत्नागिरीतील हातखंबा येथील दर्ग्याजवळ पाण्याच्या टँकरने दुचाकीस्वाराला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार शिशिर रावणंग (३६, निवळी, रत्नागिरी) यांचा जागीच मृत्यू झाला. त्याचे अपघाती निधन रत्नागिरीकरांना चटका लावून गेले. शुक्रवारी (१३ डिसेंबर) रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. टँकर चालक सोनू महतो (रा. झारखंड) याला पोलिसांनी अटक केली आहे.

दुचाकीला धडक देणारा टँकर हा मुंबई-गोवा महामार्गाचे काम करणाऱ्या एका कंपनीचा होता. शिशिर यांच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या टँकरने (क्र. एमएच ०५ बीए ३६७७) जोरदार धडक दिली. त्या धडकेत शिशिर दुचाकीवरून फेकला गेला. त्यात तो गंभीर जखमी होऊन जागीच गतप्राण झाला. या अपघातानंतर टँकर चालक तत्काळ घटनास्थळावरून पसार झाला. अपघात पाहताच तेथे असणाऱ्या आजूबाजूच्या ग्रामस्थांनी धाव घेतली. गंभीर जखमी होऊन निपचित पडलेल्या शिशिर यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात हलविले. तेथे दाखल करताच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या अपघाताची खबर हातखंबा, निवळी, तसेच रत्नागिरी शहर परिसरात पसरली. त्याच्या नातेवाईकांसह मित्रपरिवाराने जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. टँकर चालकावर तत्काळ गुन्हा दाखल करून अटकेची मागणी करण्यात आली.
शिशिर हा यापूर्वी रत्नागिरीत वीवो कंपनीमध्ये एरिया मॅनेजर म्हणून काम करत होता. अलीकडेच तो एअरटेल कंपनीत एरिया मॅनेजर म्हणून कामाला रुजू झालेला होता. शुक्रवारी रात्री ८.१५ वाजता लांजा येथील आपले काम आटोपून तो निवळी येथील आपल्या घरी निघाला होता. यावेळी हातखंबा येथील दर्गाजवळ आला असता महामार्गाचे काम करणाऱ्या एका कंपनीच्या पाण्याच्या टँकरने त्याच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. टँकर चालकाला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांकडे टँकर चालक सोनू महतो (रा. झारखंड) याला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिशिर त्याच्या कुटुंबियाचा आधार होता. आई, वडील, मोठा विवाहित भाऊ, भावजय अशा सर्वांची जबाबदारी तो सांभाळत होता. त्याच्या निधनाने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास हेड कॉन्स्टेबल रूपेश भिसे करत आहेत.



