रत्नागिरीत अनधिकृत प्रार्थनास्थळांची, अनोळखी मुलांच्या चौकशीची मनसेची मागणी

रत्नागिरी : शहरात काही बांधकाम व्यावसायिकांनी स्वतःचा व्यवसाय व्हावा, या उद्देशाने इमारतींच्या खाली अनधिकृतपणे प्रार्थना स्थळे बांधण्यात आली आहेत. त्यामध्ये चोरीछुपे लहान मुले आणली जातात. त्यांना काय प्रशिक्षण देतात, हे तेथील रहिवाशांनाही माहिती नाही. भविष्यात काही अनर्थ घडू नये, यासाठी याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
दरम्यान, त्या ठिकाणी राहणारे आमच्या मुस्लिम बांधवांविरोधात आमची काहीही तक्रार नाही. मात्र, त्यांनी याकडे लक्ष देऊन तेथे आपल्याकडे बाहेरून येणारे बांग्लादेशी, रोहिंगो तसेच नेपाळी असतील त्याचबरोबर तेथे बाहेरून येणारी छोटी मुले तेथे काय शिक्षण घेतात. त्यांना एखाद वेळी घातपाताचे प्रशिक्षण दिले, तर रत्नागिरीचे काय होईल, यासाठी माहिती घेऊन तात्काळ पोलिसांना काळवावे, असे आवाहन त्यांनी केले.
बरेचशे बांधकाम व्यावसायिक आपले व्यवसाय होत नाहीत, त्यासाठी काही ठिकाणी स्वतःहून प्रार्थनास्थळे त्यांनी तयार करून दिली आहेत. त्याच्या माध्यमातून अनैतिक कारभार होऊ शकतात. तेथे काय होणार आहे, याचा कोणताही विचार न करता केवळ आपल्याला पैसे सुटले म्हणजे झाले, त्याचा परिणाम काय होईल, याची अजिबात त्यांना जाणीव नाही. अशा बांधकाम व्यावसायिकांची यादी आपल्याकडे आली आहे. त्यासाठी लवकरच पाहणी करून त्यांची यादी जाहीर करणार असल्याचे सौंदळकर यांनी सांगितले. तसेच अनेक इमारतींमध्ये पार्किंगच्या खाली प्रार्थना स्थळे उभारण्यात आली आहेत. याबाबत नगरपालिकेला कल्पना नाही का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. रत्नागिरीत फेरीवालेही आले आहेत. त्यांची कागदपत्रे कशी उपलब्ध झाली, ती कागदपत्रे त्यांना कुणी दिली. त्याच्यावरही कारवाई झाली पाहिजेत, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.



