पालकोट, आरे, वाघिवरे ग्रामस्थांचा आमदार भास्कर जाधव यांच्या पाठीशी राहण्याचा एकमुखी निर्धार
मुंबईतील कार्यक्रमात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश

गुहागर : वर्षानुवर्ष भाजप व इतर पक्षांच्या पाठीशी राहून देखील विकासापासून वंचित राहिलेल्या गुहागर तालुक्यातील पालकोट, आरे आणि चिपळूण तालुक्यातील वाघिवरे येथील शेकडो ग्रामस्थांनी काल (१३ ऑक्टोबर) मुंबईत शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांमध्ये जाहीर प्रवेश केला आणि यापुढे कायम पाठीशी राहण्याचा शब्द दिला.
आमदार भास्कर जाधव यांनी काल मुंबईत शिवसेना भवन येथे मुंबईवासी नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी गावातील अनेक मुंबईकर ग्रामस्थ त्यांच्या भेटीसाठी आले होते. यापैकी पालकोट हे गाव पिढ्यानपिढ्या भाजपच्या पाठीशी राहणारे होते. या गावांमध्ये शिवसेनेला हाताच्या बोटावर मोजण्याइतकी सुद्धा मते मिळत नव्हती. सातत्याने प्रयत्न करून देखील या मंडळींचे मन आणि मतपरिवर्तन होत नव्हते. परंतु एका पक्षाच्या वर्षानुवर्षे पाठीशी राहून आणि राज्यात व केंद्रात या पक्षाची सत्ता असूनदेखील त्यांच्याकडून गावातील विकासकामे मार्गी लागत नाहीत. दुसरीकडे आजूबाजूच्या गावांचा तसेच संपूर्ण तालुक्यात होत असलेला आणि झालेला विकास पाहून मुंबईकर आणि स्थानिक ग्रामस्थ एकत्र आले. विरोधी पक्षाचे आमदार असताना देखील आमदार जाधव विकासात कुठेही कमी पडत नाहीत. त्यामुळे यापुढे आपण देखील सर्वांनी अशा काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी राहूया असा निर्णय करूनच सर्वजण भेटीसाठी आले होते.
आमदार श्री. जाधव यांच्याशी झालेल्या चर्चेने ही सर्व मंडळी प्रभावित झाली आणि त्यांनी तात्काळ पक्ष प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. मुंबई मंडळाचे अध्यक्ष अशोक वेद्रे, सुरेश पारदळे, आनंद पारदळे, सुरेश निकम, तुषार निकम, मनोज वेद्रे, संदीप वेद्रे, रघुनाथ वेद्रे, प्रमोद वेद्रे, विलास वेद्रे, संतोष वेद्रे, विनोद वेद्रे, अनिल काताळे, संतोष पारदळे, राहुल वेद्रे, महेंद्र निकम, विनोद वेद्रे, विशाल वेद्रे, शैलेश वेद्रे, अमोल पारदळे, प्रकाश वेद्रे, कृष्णा बेद्रे, निलेश पारदळे, दत्तराम पारदळे, ज्ञानदेव पारदळे यांच्यासह असंख्य ग्रामस्थांनी यावेळी पक्षप्रवेश केला. तसेच गुहागर तालुक्यातील आरे गावाच्या कुडतुडवाडीचे मुंबई मंडळाचे अध्यक्ष अनिल सुवरे, शिवनाथ काजारे, नरेश वीर, सुनील हुमणे, रघुनाथ सोलकर, वैभव भुवड, सुरेश हुमणे, जगदीश सोलकर यांच्यासह त्यांचे सर्व पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांनी पक्षप्रवेश केला.
चिपळूण तालुक्यातील वाघिवरे घडशी रेवाळेवाडीच्या मुंबई मंडळाचे अध्यक्ष सुरेश रेवाळे, महादेव कारते, कृष्णा कांबळे, राकेश मास्कर, नरेश घडशी, गणपत कारते, रोहित खांबे, महेश कारते, समीर रेवाळे, नितेश घडशी या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह गावच्या मुंबईवासी ग्रामस्थांनी देखील शिवसेनेमध्ये प्रवेश केला. आमदार जाधव यांनी पक्षप्रवेश केलेल्या सर्वांचे स्वागत केले आणि यापुढे विकासकामासाठी कोणापुढेही हात पसरण्याची वेळ तुमच्यावर येऊ देणार नाही, असा शब्द या तिन्ही गावातील ग्रामस्थांना दिला.



