रत्नागिरी पोलीस दलामार्फत व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टम, चारचाकी वाहने आणि ई-बाई बाईक्सचा आज लोकार्पण सोहळा
सायबर गुन्हे प्रतिबंध जनजागृती कार्यक्रम

रत्नागिरी : रत्नागिरी पोलीस दलाच्या वतीने आज (२० फेब्रुवारी) सकाळी ११ वाजता वीर सावरकर नाट्यागृहात ‘व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टम’ (VMS), १० चारचाकी वाहने आणि १४ ई-बाईक यांचा लोकार्पण सोहळा व उद्घाटन समारंभ राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेला आहे.

या प्रसंगी गृह(शहरे), महसूल, ग्राम विकास व पंचायत राज, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह जिल्ह्यातील मान्यवर खासदार व आमदार तसेच कोंकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह हे उपस्थित असणार आहेत.
नागरिकांचे जीवनमान सुकर करण्याकरिता रत्नागिरी पोलीस दलामार्फत व्हिजीटर मॅनेजमेंट सिस्टम (VMS) प्रणालीचा वापर करण्यात येणार, १० चार चाकी वाहनांचा गुन्हे प्रतिबंध व पेट्रोलिंगसाठी वापर होणार असून, ई-बाईकच्या माध्यमातून सागरी गस्तीबरोबरच पर्यटक सुरक्षितता आणि दुर्घटना प्रतिबंध करण्यासाठी वापर होणार आहे.

उद्घाटन समारंभावेळी सायबर जनजागृतीचे देखील प्रदर्शन होणार आहे. यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना मोठ्या संखेने उपस्थित राहावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे.



