कोकण रेल्वे मार्गावर १५ सप्टेंबरला मडगाव ते पनवेलदरम्यान धावणार विशेष गाडी

रत्नागिरी : गणपती विसर्जनानंतर वाढलेली गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या सहयोगाने गर्दीनुसार विशेष गाड्यांचे नियोजन करण्याचे धोरण स्वीकारले आहे. यानुसार १५ सप्टेंबरला मडगाव ते पनवेल मार्गावर विशेष गाडी (०१४२७/०१४२८)सोडण्यात येणार आहे.
गणेशोत्सवाला आलेल्या चाकरमान्यांची परतीची संख्या लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर अतिरिक्त गाड्यांचे नियोजन केले जात आहे. जेणेकरून प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल. १५ सप्टेंबर रोजी मडगाव ते पनवेल मार्गावर विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. एकूण २० एलएचबी डब्यांसह ही गाडी धावणार आहे. १५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी विशेष गाडी (०१४२८) सुटेल. पनवेलला ती रात्री १० वाजून १५ मिनिटांनी पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी (०१४२७) पनवेल येथून रात्री ११ वाजून ४५ मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता ती मडगाव ला पोहोचणार आहे.
ही गाडी करमाळी, थिवी, सावंतवाडी, झाराप, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, नांदगाव रोड, वैभववाडी रोड, राजापूर, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर, आरवली, सावर्डा, चिपळूण, खेड, वीर, माणगाव रोड तसेच पेण या थांब्यांवर थांबेल.



