रत्नागिरी भाजपाच्या वतीने वीर सावरकरांना अभिवादन

रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांना आज त्यांच्या १४१ व्या जयंतीनिमित्त रत्नागिरीतील सावरकरप्रेमींनी अभिवादन केले. रत्नागिरीचे माजी आमदार बाळासाहेब माने, भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शहराध्यक्ष राजेंद्र फाळके, भाजप अनुसूचित जाती जमाती मोर्चा जिल्हाध्यक्ष नीलेश आखाडे, अमित विलणकर, परशुराम तथा दादा ढेकणे, मंदार खंडकर आदींसह भाजप कार्यकर्त्यांनी कारागृहातील वीर सावरकर स्मारकाला भेट दिली. तसेच लक्ष्मी चौक येथे पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करत भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणा दिल्या.
या वेळी बाळासाहेब माने यांनी सांगितले की, रत्नागिरीमध्ये स्वा. सावरकरांना ब्रिटिशांना स्थानबद्ध केले, या गोष्टीला शंभर वर्षे झाली आहेत. त्या काळी जिल्हा सोडायचा नाही व राजकारणात भाग घ्यायला सावरकरांना बंदी केली होती; परंतु सावरकरांनी समाजकारण करत हिंदू धर्मासाठी अनेक गोष्टी केल्या. समाजातील सर्व घटकांना एकत्र करण्याचे काम त्यांनी केले. उपेक्षितांसाठी विठ्ठल मंदिर खुले केले, सावरकरांच्या विनंतीवरून रत्नागिरीचे दानशूर, भंडारीभूषण भागोजीशेठ कीर या महान व्यक्तिमत्वाने पतितपावन मंदिर जागा घेऊन, स्वखर्चाने उभे केले. वीर सावरकरांचे कार्य रत्नागिरीकर विसरू शकत नाही.



