मुख्य बातमीराजकीय

रत्नागिरी, सिंधुदुर्गातील रस्ते काय तुमच्या बापजाद्यांनी विकत घेतलेत का : खा. राऊत

महाआघाडीचा शिरगांव व मिरजोळे जिल्हा परिषद गट मेळावा

रत्नागिरी : उद्धव ठाकरे जर रत्नागिरीत येऊन आमच्या नेत्यांबद्दल बोलले तर परत जाण्याचा रस्ता मी दाखवेल ह्या नारायण राणे यांच्या वक्तव्यावर महाआघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्ते काय तुमच्या बापजाद्यांनी विकत घेतलेत का, अशी विचारणा केली.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांचा शिरगांव व मिरजोळे जिल्हा परिषद गट मेळावा शिरगाव येथील ओंकार मंगल कार्यालयात आज (२५ एप्रिल) झाला. त्यावेळी ते बोलत होते.
श्री. राऊत यांनी सर्वप्रथम आघाडीच्या नेत्यांना धन्यवाद देत स्वतःच्या उमेदवारीसाठी सर्वांचे आभार मानले तसेच हे भाग्य इतर बाजारबुनग्यांना लाभले नाही कारण तिकडे अजून ही कलगीतुरा सुरू असल्याचे म्हणत अप्रत्यक्षरित्या नारायण राणे यांना टोला मारला.
उपस्थितांना संबोधित करताना श्री. राऊत पुढे म्हणाले. “आम्हाला जनतेच्या मनातले ऐकणारा नेता हवा आहे, स्वतःची मन की बात करणारा नको..! आम्हाला रेशनिंगवर तांदूळ देता आणि तेही प्लास्टिकचे..! बर या तांदळाबरोबर भात बनवला, तर सोबत खायला काही नाही. कारण महागाई एवढी वाढली आहे. देशातल्या सोन्याचे भाव वाढवून परदेशात ज्यांच्या खाणी आहेत, त्या सरकारच्या जावयांचे कल्याण करण्याचा भाजपचा डाव आहे. आता अदानीची नजर सह्याद्री पट्ट्यातील जमिनीवर पडली आहे. त्यासाठी इथे पावर प्लांट्सच्या नावाखाली जमिनी हडपण्याचा त्यांचा डाव आहे. पण जो पर्यंत आम्ही आहोत तोवर यांचा हा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. त्याचसाठी शिंदे-फडणवीस सरकारच्या माध्यमातून कोकणावर सिडको प्राधिकरण लादून ग्रामपंचायतचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सिडकोच्या माध्यमातून जमिनीवर आरक्षण टाकून त्या परप्रांतीय उद्योगपतींच्या घश्यात घातल्या जाण्याची भीती आहे आणि त्याच विरोधात “हा विनायक राऊत उभा आहे ” असे सांगताना, उद्या नारायण राणे मत मागायला आला की सिडकोबाबत तुमची भूमिका काय आहे, हे अवश्य विचारा.”
त्याचप्रमाणे सामान नागरी कायद्याला आमचा विरोध नसून त्या कायद्याच्या माध्यमातून एखाद्या जातीला एखाद्या धर्माला जर टार्गेट केले जाणार असेल तर आम्ही विरोध करणारच असे ही त्यांनी ठामपणे सांगितले.
या प्रसंगी लोकसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, तालुका प्रमुख बंडयाशेठ साळवी, राष्ट्रवादी चे बशीरभाई मुर्तूझा, काँग्रेस च्या न्याय व विधी शाखेच्या ॲड. अश्विनी आगाशे, प्रमोद शेरे, दुर्गेश साळवी, कुमार शेट्ये, अप्पा वांजरकर, राजन सुर्वे, मिलिंद किर, जुबेर काझी, राजेंद्र महाकाल, प्रसाद सावंत, संजय पुनस्कर, संजय साळवी, शेखर घोसाळे, आबा घोसाळे, अप्पा धामस्कर आदी इंडिया आघाडी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button