देश-विदेशमुख्य बातमी

‘दुसऱ्यांवर अवलंबून राहणारा देश कधीही आत्मनिर्भर होऊ शकत नाही’ – गौतम अदाणींचे भाष्य!

      तेल दरवाढीच्या पार्श्वभूमीवर गौतम अदाणींचे भाष्य 

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावामुळे जागतिक तेल वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या दरांमध्ये सतत आणि तीव्र चढ-उतार होत आहेत. या पार्श्वभूमीवर, अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांनी सोमवारी ‘CII शिखर परिषदे’त ऊर्जा स्वातंत्र्याच्या विषयावर सविस्तर भाष्य केले.

“जर एखादे राष्ट्र आपल्या अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या ऊर्जेसाठी किंवा आपले भवितव्य घडवणाऱ्या बुद्धिमत्तेसाठी इतरांवर अवलंबून असेल, तर ते स्वतःला खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर म्हणवू शकत नाही”, असे गौतम अदाणी यांनी या परिषदेत म्हटले.

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावामुळे पश्चिम आशियामध्ये अशांतता निर्माण झाली असून, यामुळे कच्च्या तेलाच्या दरांमधील अस्थिरता वाढली आहे. या संदर्भात बोलताना, ऊर्जा आणि डिजिटल क्षमता या देशाच्या सामर्थ्याचा केंद्रबिंदू कशा बनत आहेत, यावर गौतम अदाणी यांनी प्रकाश टाकला.

शांतता प्रस्तावावर अमेरिका आणि इराण यांच्यात एकमत होऊ न शकल्यामुळे, कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल १०४-१०५ डॉलरच्या वर गेले आहेत. या पार्श्वभूमीवर अदाणी यांचे विधाने आले आहे. या दरवाढीमुळे ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’सह (Strait of Hormuz) जागतिक पुरवठा मार्गांमध्ये व्यत्यय येण्याची शक्यता निर्माण झाली असून, त्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. दरांमधील या अचानक वाढीमुळे, भारतासारख्या तेल आयातीवर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्थांच्या ‘ऊर्जा-स्वावलंबना’बाबतची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे

     ऊर्जा आणि डिजिटल सुरक्षा देशाच्या ताकदीचे आधारस्तंभ

या पार्श्वभूमीवर, अदाणी यांनी ऊर्जा आणि तंत्रज्ञान या दोन्ही क्षेत्रांमध्ये ‘स्वायत्तते’साठी जोरदार युक्तिवाद करताना म्हटले, “मध्यपूर्वेतील अलीकडील संघर्ष आणि पायाभूत सुविधांवर झालेले हल्ले यांतून एक गोष्ट अधिकच स्पष्ट झाली आहे, ती म्हणजे ऊर्जा सुरक्षा आणि डिजिटल सुरक्षा हे आता स्वतंत्र घटक राहिलेले नाहीत. तर, आता ते देशाच्या ताकदीचे दुहेरी आधारस्तंभ बनले आहेत.

जो देश आपल्या ऊर्जेवर नियंत्रण ठेवेल तोच आपल्या औद्योगिक भविष्याची दिशा ठरवेल

त्यांनी पुढे असेही नमूद केले, “हे अधिकाधिक स्पष्ट होत आहे की, जो देश आपल्या ऊर्जेवर नियंत्रण ठेवेल, तोच आपल्या औद्योगिक भविष्याची दिशा ठरवेल. जो देश आपल्या ‘कम्प्युट’ (संगणकीय क्षमते)वर नियंत्रण ठेवेल, तो आपल्या बौद्धिक भविष्याची दिशा ठरवेल आणि जो देश या दोन्ही गोष्टींवर नियंत्रण ठेवेल, तोच पुढील शतकाचा आकार घडवेल. हीच सत्तेची नवी भूमिती (Geometry) आहे.”

तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (रविवारी) इराण-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना इंधनाचा वापर कमी करण्याचे, आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याचे आणि परकीय चलन वाचवण्याचे आवाहन केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button