ठेकेदारांची बिले थकल्यामुळे रत्नागिरीत जलजीवन मिशनची अनेक कामे ठप्प ?

रत्नागिरी :खेड्यापाड्यातील प्रत्येकाला पिण्यायोग्य पाणी मिळावे, यासाठी शासनाने जलजीवन मिशनअंतर्गत विविध योजना राबविण्यास सुरुवात केली. मात्र, या योजनेंतर्गत काम करणाऱ्या ठेकेदारांची काही कोटीत रुपयांची बिले प्रलंबित असल्याने मोठा आर्थिक पेच निर्माण झाला आहे. परिणामी ठेकेदारांनी काम बंद करण्याचा निर्णय घेतला असून, जिल्ह्यातील सुमारे अनेक योजनांचे काम ठप्प झाले आहे.
जिल्ह्यात एकूण १,४३२ योजना मंजूर असून, त्यापैकी १,४२८ योजनांना कार्यादेश देण्यात आले होते. प्रत्यक्षात १,४१३ कामे सुरू झाली होती. त्यापैकी ५६४ योजना पूर्णत्वास गेल्या आहेत. तर ३०५ योजनांचे ७५ ते १०० टक्के काम, ३०७ योजनांचे ५० ते ७५ टक्के काम, १७५ योजनांचे २५ ते ५० टक्के काम झाले असून, ५४ योजनांचे शून्य ते २५ टक्के काम झाले आहे.
कामे वेगवेगळ्या टप्प्यांवर असतानाही ठेकेदारांना अद्याप पैसे न मिळाल्याने ते वारंवार जिल्हा परिषदेच्या दारात धावत आहेत. मात्र, शासनाकडूनच निधी न आल्याने बिले अडली आहेत. त्यामुळे जलजीवन मिशनची अनेक कामे अधांतरी राहिली असून, शासनाकडून निधी उपलब्ध झाल्याशिवाय ही कामे पूर्ण होणार नाहीत, हे आता स्पष्ट झाले आहे.



