एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन

रत्नागिरी : एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात कै. मृणाल हेगशेट्ये राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा रंगणार आहे, १२ व १३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय घवाळी यांनी केले आहे.
१२ सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय माध्यमिक गटाची, तर १३ सप्टेंबर रोजी कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयीन गटांची वक्तृत्व स्पर्धा होईल.
माध्यमिक गटासाठी ठेवलेले विषय विद्यार्थी मनाला भिडणारे असून, ‘विज्ञान कथाकार – जयंत नारळीकर’, ‘जीएसटी : एक जिझिया’, ‘आम्ही तिसऱ्या महायुद्धाच्या क्षितिजावर!’, ‘हिंदी सक्ती : गरज कोणाची?’, तसेच ‘समाजभान ‘रत्न’–रतन टाटा’ हे विषय चर्चेत रंगत आणतील.
कनिष्ठ महाविद्यालयीन गटासाठी ‘अभिजात माय मराठी’, ‘भारतीय अर्थव्यवस्थेची जागतिक पत’, ‘इव्हीएम : विश्वासार्हता आणि ४५ दिवस’, ‘खासगी क्लासेसचे आक्रमण’, तसेच ‘दानशूर भागोजी कीर’ हे विषय ठेवण्यात आले आहेत.
राज्यस्तरीय वरिष्ठ गटासाठी ‘बहुआयामी साहित्यिक–जयवंत दळवी’, ‘ट्रम्पशाही आणि जागतिक अर्थकारण’, ‘आणीबाणी : इतिहास आणि वर्तमान’, ‘अरण्यऋषी–मारुती चितमपल्ली’ आणि ‘जातीय जनगणनेची अपरिहार्यता’ हे विषय स्पर्धकांसमोर ठेवले गेले आहेत.
स्पर्धेसंदर्भातील अधिक माहितीसाठी प्रा. सचिन टेकाळे यांच्याशी संपर्क साधावा, असे आयोजकांनी सांगितले.



