इंडिया आघाडी म्हणजे औरंगजेब फॅन क्लब : अमित शहा
नारायण राणेंच्या प्रचारार्थ गृहमंत्री रत्नागिरीत

रत्नागिरी : “उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही नकली असून, इंडिया आघाडी म्हणजे औरंगजेब फॅन क्लब आहे. त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्गतील लोकांनी ठरवायचे आहे की त्यांना मोदींबरोबर जायचे आहे की औरंगजेब फॅन क्लब सोबत”, अशा शब्दांत टीका करतानाच भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासकामांचा पाढा उपस्थितांसमोर वाचला.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी भारताचे गृहमंत्री अमित शहा आज (२ मे) रत्नागिरीत आले होते. गोगटे कॉलेजच्या जवाहर मैदानावर झालेल्या आजच्या सभेत त्यांनी राहुल गांधी, उद्धव ठाकरे यांचा आपल्या भाषणातून खरपूस समाचार घेतला. या वेळी व्यासपीठावर रत्नागिरीचे पालकमंत्री, आमदार उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, आमदार शेखर निकम, सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजप प्रदेशध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, माजी आमदार बाळ माने, माजी आमदार विनय नातू, माजी आमदार राजन तेली, माजी खासदार डॉ. नीलेश राणे, आमदार नीतेश राणे, राष्ट्रवादीचे महायुती समन्वयक अजित यशवंतराव, भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष ऍड. देवेंद्र तथा बंटी वणजू, शिल्पा पटवर्धन यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
गृहमंत्री शहा म्हणाले, “रत्नागिरी, सिंधुदुर्गची ही भूमी पवित्र असून अनेक रत्नांची खाण आहे. लोकमान्य टिळक, वीर सावरकर यांच्या स्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. या भूमीत वीर सावरकर यांना तुरुंगात ठेवण्यात आले. त्यांनी आपले आयुष्य हिंदुत्त्वासाठी दिले; मात्र आज उद्धव ठाकरे यांना याच सावरकरांचे नाव आपल्या भाषणात घ्यायला लाज वाटते… अरे कसली शिवसेना तुमची? उद्धव ठाकरे हे नकली शिवसेना चालवत असून, खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यसोबत आहे.”
ते पुढे म्हणाले, “नारायण राणे यांना मिळणारे एक एक मत मोदींना मिळणार आहे. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले तर आता जागतिक अर्थव्यवस्थेत पाचव्या क्रमांकावर असलेला भारत तिसऱ्या स्थानावर येईल. स्वतःच्या स्वार्थसाठी, मुख्यमंत्री बनण्यासाठी उद्धव ठाकरे राष्ट्रवादी आणि काँग्रेस च्या मांडीवर जाऊन बसले, ते राष्ट्रवादी आणि काँग्रेवाले ३७० कलम रद्द होऊ नये म्हणून विरोध करत होते. राणेंच्या मंत्रालयात मोदींच्या मार्गदर्शनाखाली चांभार, लोहार अशी २० प्रकारची छोटे छोटे उद्योग करणाऱ्या विश्वकर्मा समाजासाठी १३ हजार कोटींचा प्रकल्प सुरू आहे.”
यावेळी शहा यांनी देशाला विकसित करण्याची वेळ आली असून राणेंना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचे आवाहन केले. आपल्या भाषणातून त्यांनी उद्धव ठाकरे, राहुल गांधी यांच्यावर हल्ला चढतानाच काश्मीर, ३७० कलम, ट्रिपल तलाख तसेच मोदींनी केलेला विकास आणि त्यांनी राबवलेल्या योजनांचा आढावा घेतला.



