म… मनोमिलनाचा !!

गेली दोन दशके चालू असलेले ‘भ’ म्हणजेच ‘भाऊबंदकी’चे नाट्य समाप्त होऊन महाराष्ट्राच्या राजकीय बाराखडीमध्ये पुढील अक्षर ‘म’चा, अर्थात मनोमिलनाचा प्रयोग सुरू झाला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या एकत्रित मेळाव्यातून मुंबईत या प्रयोगाची नांदीही धडाक्यात पार पडली.
ठाकरे बंधूंचा ‘म’ हा ‘मराठी’चा नसून ‘महापालिकेचा आहे, अशी टीका भारतीय जनता पक्ष, अर्थात ‘म’हाशक्तीच्या नेत्यांनी केली होती. त्यावर ‘महापालिकाच काय; आमचा ‘म’ हा ‘महाराष्ट्राचा‘ आहे,’ असे उत्तर देऊन उद्धव ठाकरे यांनी दिलेली ‘एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी,’ ही घोषणा हा मेळाव्याचा राजकीय संदेश आहे. दोन्ही भावांचे पक्ष एकत्र निवडणुका लढणार का, दोघांचे कार्यकर्ते आणि मतदार त्यांना कसा प्रतिसाद देणार आणि महाविकास आघाडीची फेरमांडणी होणार का, असे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित असले, तरी विधानसभेच्या निवडणुकीनंतर काहीशा एकसुरी बनलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणात या मेळाव्याने नवे रंग भरले आहेत, हे नक्की.
हिंदीसक्तीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात उभा राहिलेला जनरोष आणि सरकारने घेतलेली माघार, ही या विजयी मेळाव्याची पार्श्वभूमी असली, तरी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र व्यासपीठावर येणे, हेच सर्वांच्या उत्सुकतेचे केंद्र होते. दोन्ही भावांनीही ‘मराठीसाठी’ झालेल्या बंधुभेटीतून आपल्या समर्थकांना आशेचे किरण दाखवले आहेत. ‘ठाकरे कुटुंबाने एकत्र यावे,’ अशा सदिच्छा बाळगणाऱ्यांसाठी आदित्य आणि अमित ठाकरे या नव्या पिढीची सौख्यपूर्ण देहबोली, हा भावनोत्कट क्षण ठरावा. अर्थात, दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावे, असा आग्रह असणाऱ्यांपैकी बहुतेकांना त्यांचे ‘राजकीय ऐक्य’च अपेक्षित आहे, हे उपस्थितांच्या प्रतिसादावरून स्पष्टपणे दिसून आले. त्या पार्श्वभूमीवर भविष्यातील राजकीय वाटचालीबाबत राज यांनी सावध भूमिका मांडली; उद्धव यांनी मात्र हे ऐक्य दूरगामी असेल, हे वारंवार मांडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट हल्ले चढवून भविष्यातील लक्ष्यही स्पष्ट केले. त्यामुळे ‘या मेळाव्यातून राजकीय अर्थ काढू नका,’ असे नेते म्हणत असले, तरी कार्यकर्ते आणि मतदारांनीही यातून योग्य तो संदेश घेण्यात काही प्रत्यवाय नाही.
वर्चस्वाच्या झगड्यातून शिवसेनेतून वेगळे होऊन राज ठाकरे यांनी ‘मनसे’ची स्वतंत्र चूल मांडल्यानंतर गेल्या १९ वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. सध्याची राज्यातील स्थिती पाहता दोघांनीही एकत्र येणे, हा त्यांच्या राजकीय अस्तित्वाचा विषय बनल्याचे दिसून येते. मराठी मतदारांचे भक्कम पाठबळ आणि गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना मुस्लिम मतदारांची साथ, हे नवे समीकरण मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत प्रभावी ठरू शकते, याचाही विचार जाणकारांनी केला असेलच. राज यांची वक्तृत्वशैली-करिष्मा आणि उद्धव यांचे संघटनकौशल्य परस्परांना पूरक ठरू शकते. या संभाव्य ऐक्यातून दोघांनाही काही फायदे आहेत, तसेच या वाटेत काही अडथळेही आहेत. महत्त्वाचे म्हणजे शिवसेनेचे कार्यकर्ते असोत की मनसेचे; दोघांचाही ‘डीएनए’ एकच असल्याने हे ऐक्य कार्यकर्त्यांच्या पातळीवर झिरपण्यात फारशा अडचणी नाहीत. मात्र, या ऐक्यातून संधी गमावण्याची भीती असलेल्या महत्त्वाकांक्षी नेत्यांची समजूत काढणे, हे आव्हान ठरू शकते.
मराठीप्रेमी संस्थांसह महाविकास आघाडीतील विविध पक्षांचे प्रतिनिधी या व्यासपीठावर होते; मात्र हिंदीसक्तीच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपैकी माजी खासदार भालचंद्र मुणगेकर वगळता इतरांनी या मेळाव्याकडे पाठ फिरवणे ‘मविआ’च्या फेरजुळणीकडे अंगुलीनिर्देश करणारे आहे. या संभाव्य ऐक्यात आपले स्वतंत्र अस्तित्व गमावण्याची चिंता आणि मुस्लिम-परप्रांतीय मतदार दुरावण्याची भीती पाहता, काँग्रेस नेत्यांनी स्वबळावर लढण्याचा आग्रह श्रेष्ठींकडे धरला आहे.
दुसरीकडे ठाकरे बंधूंचे ऐक्य शिवसेनेच्या फुटीतूनच राजकीय प्राणवायू मिळविणारे एकनाथ शिंदे यांच्या मुळावर येऊ शकते. त्या दृष्टीने राज यांनी चेष्टेत; तर उद्धव यांनी कडवटपणे या ऐक्याच्या रचनेचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. त्यामध्ये तथ्य असेल, तर महायुतीतले बेबनाव आणि महाशक्तीचे डावपेचही अधोरेखित होतात. मराठीजनांच्या ऐक्यामुळे होणाऱ्या ध्रुवीकरणातून इतर भाषकांना फार न दुखावता आपापल्या मतपेढ्या बांधण्याचे डावपेच सुरू झाले आहेत. या राजकारणाच्या आणि भावनेच्या पलीकडे जाऊन ठाकरे बंधू मराठीजनांचे हित जोपासण्यासाठी आणि मुख्य म्हणजे मुंबईकरांचे जीवन सुसह्य करण्यासाठी काय ठोस कार्यक्रम आखणार, हे पाहावे लागेल,ते अधिक महत्त्वाचे आहे.


