हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ५ जुलै रोजी मुंबईत मोर्चा, दोन्ही ठाकरे एकत्र !

मुंबई : इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात ठाकरे बंधू आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी (२६ जून) पत्रकार परिषद घेत ५ जुलै रोजी (आधी ६ जुलै ही तारीख जाहीर केली होती, जी काही वेळाने बदलण्यात आली) मुंबईतील गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली. तर, शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषाप्रेमींच्या ७ जुलै रोजीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. मात्र, आता दोन्ही ठाकरे बंधू ५ जुलै रोजी मुंबईत मोर्चा काढणार असल्याचं शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी जाहीर केलं आहे. याबाबत आपलं दोन्ही नेत्यांशी बोलणं झाल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं.
संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रातील शालेय शिक्षणात सध्या हिंदी भाषेची सक्ती करण्यात आली असून त्यास विरोध होत आहे. त्रिभाषा सूत्राच्या नावाखाली आमच्या लहान मुलांवर हिंदी भाषा लादली जात आहे. हे हिंदी भाषेचं ओझं आमच्या मुलांना पेलवणार नाही, असं भाषातज्ज्ञांचं म्हणणं आहे. महाराष्ट्रातील अनेक राज्यांची तशीच भूमिका आहे.
आमचा काही हिंदी भाषेला विरोध नाही. मात्र, शालेय शिक्षणात अशा प्रकारची जबरदस्ती आम्ही खपवून घेणार नाही. या त्रिभाषा सूत्रतून गुजरात राज्याला मात्र वगळलं आहे आणि महाराष्ट्रावर सक्ती केली जात आहे. याला मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या संस्था-संघटनांनी विरोध करत ७ जुलै रोजी मोर्चाचं आयोजन केलं होतं. त्यास उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता.



