नवनिर्माण’च्या स्कॉलरसर्च परीक्षेत ‘ वेदांतिका पवार ठरली ‘स्कॉलर’

रत्नागिरी-नवनिर्माण ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स आयोजित स्कॉलर सर्च 2025 परीक्षेमध्ये वेदांतिका बापूसाहेब पवार( शिर्के हायस्कूल रत्नागिरी ) हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या रत्नागिरी येथील नवनिर्माण ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयातर्फे दरवर्षी जिल्हास्तरीय स्कॉलर सर्च परीक्षा दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाते. विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षेचे ज्ञान अवगत व्हावे या उद्देशाने ही परीक्षा दहावीच्या भाषा विज्ञान गणित सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी अभ्यासक्रमावर आधारित ही वस्तुनिष्ठ परीक्षा घेतली जाते. यावर्षी या परीक्षेचे हे आठवे वर्ष. दरवर्षी या परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग मिळत असतो. लांजा, संगमेश्वर, राजापूर, रत्नागिरी या तालुक्यातील विद्यार्थ्यांचा या परीक्षेसाठी मोठा सहभाग असतो. प्राथमिक फेरीसाठी यावर्षी 32 शाळेतील दिड हजार विद्यार्थी प्रविष्ट झाले. यातून अंतिम फेरीसाठी 116 विद्यार्थी पात्र ठरले. त्यांची दुसऱ्या फेरीतील परीक्षा नवनिर्माण महाविद्यालयात घेण्यात आली. या अंतिम परीक्षेत 8 विद्यार्थी चमकले.
यशस्वी विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षीस आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
अंतिम परीक्षेत वेदांतिका बापूसाहेब पवार( शिर्के हायस्कूल रत्नागिरी ) हिने प्रथम क्रमांक पटकावला. तिला 3 हजार रुपये रोख आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले. द्वितीय क्रमांक आशय नंदकुमार पाटील (नाथ पै हायस्कूल हरचे ) याने द्वितीय क्रमांक संपादन केला. त्याला 2 हजार रुपये व प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले तर पटवर्धन हायस्कूलच्या श्रावणी दिनेश वाडेकर आणि आर्यन विनोद गुरव यांना विभागून तृतीय क्रमांक देण्यात आला. त्यांना 500 रुपये आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. रुद्र नरेंद्र नलगे( शिर्के हायस्कूल रत्नागिरी), राकेश अर्जुनलाल परमार (डीजे सामंत हायस्कुल पाली), आयेशा ठाकूर (एडी नाईक हायस्कूल) आणि संस्कार दिनेश बारगुडे (करबुडे हायस्कूल) या विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ 500 रुपये आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी रत्नागिरी वाहतूक नियंत्रक पोलिस निरीक्षक अश्वनाथ बाप्पाची खेडकर लाभले यावेळी मार्गदर्शन करतांना अश्वनाथ बाप्पाची खेडकर यांनी विद्यार्थ्यांनी कोणताही न्यूनगंड न बाळगता स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पुढे येणे गरजेचे आहे असे सांगितले. कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख सुकुमार शिंदे यांनी शुभेच्छा पत्र मार्गदर्शन केले. संचालिका सीमा हेगशेट्ये यांनी स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर विद्यार्थ्यांनी ज्ञान मिळवण्याची आस बाळगणे आवश्यक आहे असे सांगितले. बक्षीस वितरण सोहळ्याचे प्रास्ताविक प्रा.सचिन टेकाळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. निकिता नलावडे तर आभार प्रदर्शन प्रा. रोहित यादव यांनी केले.
या प्रसंगी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, लांजा, रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यातील बहुसंख्य विद्यार्थी विविध विद्यालयातील शिक्षक, महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित राहिले.



