घाटकोपर जॉली जिमखाना राज्य कॅरम स्पर्धेत रत्नागिरीची आकांक्षा कदम विजेती

रत्नागिरी : घाटकोपर जॉली जिमखाना आयोजित दुसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या महिलांच्या अंतिम सामन्यात तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत रत्नागिरीच्या आकांक्षा कदमने मुंबईच्या मिताली पाठकला २५-१९, १२-२१, २५-१३ असे पराभूत करून या गटाचे विजेतेपद पटकाविले. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या महिलांच्या लढतीत मुंबईच्या रिंकी कुमारीने मुंबई उपनगरच्या प्राजक्ता नारायणकरला २५-५, १५-२२, २५-५ असे पराभूत केले.

महिलांच्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्यापूर्वी मिताली पाठकने मुंबई उपनगरच्या प्राजक्ता नारायणकरला २१-१४, १६-१७, २१-२० असे तर आकांक्षाने मुंबईच्या रिंकी कुमारीवर २४-१४, २५-१४ अशी मात केली होती. विजेत्यांना घाटकोपर जॉली जिमखान्याचे मानद सचिव मुकेश बदानी व महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार यांच्या शुभ हस्ते रोख पारितोषिके व चषक देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी राज्य कॅरम संघटनेचे खजिनदार अजित सावंत, मुंबई उपनगर जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष संतोष चव्हाण तसेच घाटकोपर जॉली जिमखान्याचे खजिनदार बलवंत संगरका व मिकीन सेठ, ट्रस्टी मारिश गांधी व नीलकंठ सेठ,स्पोर्ट्स समन्वयक प्रशांत कार्या व स्पर्धा समन्वयक नलिन मेहता उपस्थित होते.



