मुख्य बातमीसाहित्य-कला

राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय पातळीवरील ‘महात्मा फुले विचार संमेलन’ नोव्हेंबरमध्ये पुण्यात.

पुणे : राष्ट्र सेवा दलाच्या पुढाकाराने राष्ट्रीय पातळीवरील भव्य ‘महात्मा फुले विचार साहित्य संमेलन’ यंदा सांस्कृतिक राजधानी पुण्यात आयोजित करण्यात आले आहे.

 २७, २८ आणि २९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत तीन दिवस रंगणाऱ्या या महोत्सवात विचार, साहित्य आणि संस्कृतीचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे. 

या संमेलनात देशभरातील ख्यातनाम विचारवंत, राजकीय व सामाजिक भाष्यकार, अभ्यासक, संशोधक, लेखक, कवी, संपादक, पत्रकार, प्राध्यापक, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच ‘जेन झी’ आंदोलनातील विविध विद्यापीठांचे तरुण विद्यार्थी प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

राष्ट्र सेवा दलाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजा कांदळकर यांनी अधिकृत पत्रकाद्वारे ही महत्त्वपूर्ण माहिती प्रसिद्ध केली आहे.

ऐतिहासिक घटनांच्या पार्श्वभूमीवर ‘विषमता निर्मूलन निर्धार वर्ष’

महात्मा जोतीराव फुले यांची जन्म द्विशताब्दी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ऐतिहासिक महाड चवदार तळ्याच्या सत्याग्रहाची शताब्दी, मनुस्मृती दहनाची शताब्दी आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाचा पाया रचत दिलेल्या आरक्षणाला १२५ वर्षे पूर्ण होणे, असा ऐतिहासिक योग जुळून आला आहे. या सर्व महत्त्वपूर्ण सामाजिक चळवळींचे औचित्य साधून राष्ट्र सेवा दलाच्या वतीने वर्षभर संपूर्ण देशभरात ‘विषमता निर्मूलन निर्धार वर्ष’ साजरी केले जात आहे. याच उपक्रमाचा एक मुख्य भाग म्हणून या तीन दिवसीय विचार, साहित्य आणि संस्कृती संमेलनाचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे.

विविध वैचारिक व सांस्कृतिक उपक्रमांची रेलचेल

या तीन दिवसीय संमेलनात केवळ व्याख्यानेच नाही तर विविध नाविन्यपूर्ण व वैचारिक उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे. संमेलन परिसरात भव्य पुस्तक प्रदर्शन, ‘जेन झी’ आंदोलनातील तरुण विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोस्टर्सचे विशेष प्रदर्शन, तसेच देशातील तरुण व्यंगचित्रकारांच्या कलाकृतींचे लाईव्ह प्रदर्शन भरवले जाणार आहे. याव्यतिरिक्त, नागरिकांमध्ये संवैधानिक मूल्यांची जपणूक व्हावी यासाठी एक विशेष ‘संविधान दालन’ उभारले जाणार आहे.

संमेलनात विविध सामाजिक, राजकीय व शैक्षणिक विषयांवर टॉक शो, मान्यवरांच्या मुलाखती, प्रबोधनात्मक व्याख्याने, नाटके, पुरोगामी गाणी आणि काव्यसंमेलनांचे आयोजन केले जाईल. विशेषतः प्रकाशकांच्या पुस्तक दालनात ‘लेखक आणि कवी आपल्या भेटीला’ हा संवादपर उपक्रम रसिकांचे आणि वाचकांचे खास लक्ष वेधून घेईल.

या राष्ट्रीय संमेलनाच्या नियोजनासाठी एक सर्वसमावेशक संमेलन समिती स्थापन करण्यात आली आहे.

या समितीत लक्ष्मीकांत देशमुख, भारत सासणे, राजन गवस, प्रवीण बांदेकर, नीरज हातेकर, अलीम वकील, अरुण म्हात्रे, ज्ञानेश महाराव, निशिकांत कोलगे, आशालता कांबळे, विनोद शिरसाठ, लक्ष्मण यादव, हुबनाथ पांडे, प्रकाश दुबे, प्रदीप दाते, किशोर ढमाले, सुबोध मोरे, प्रतिमा परदेशी, सोमनाथ रोडे, सरफराज अहमद, सूरज येंगडे, जयवंत पाटील, अजित शिंदे आणि राजा कांदळकर यांचा समावेश आहे. तसेच या समितीत विशेष निमंत्रित म्हणून कपिल पाटील, सुभाष वारे, अंजली आंबेडकर, अभिजित वैद्य आणि नितीन वैद्य काम पाहणार आहेत.

पुण्यातील संमेलनाच्या अधिकृत स्थळाची माहिती लवकरच जाहीर केली जाणार आहे. हे संमेलन अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक कसे करता येईल, याबद्दल नागरिकांना अथवा अभ्यासकांना काही सूचना करायच्या असल्यास त्यांनी आयोजकांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संमेलनातील सहभाग, नोंदणी आणि अधिक माहितीसाठी

रोहित ढाले (९८६९८१९८७८), सागर भालेराव (९९६७०५५६३०), प्रशांत इंगळे (९४२०८८९८६२) आणि अभिजित आंब्रे (८६०५४००३७३) या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधता येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button