काजू बी शासन अनुदान योजनेला ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

रत्नागिरी : सन २०२४ च्या काजू हंगामासाठी काजू उत्पादनाकरिता शासनाने राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी काजू बी शासन अनुदान योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या अनुदान योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य काजू मंडळचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी केले आहे.
या योजनेची अंमलबजावणी बाबतची प्रक्रिया पणन मंडळाच्या www.msamb.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अनुदान मागणीसाठी विहीत नमुन्यातील अर्ज, संमतीपत्र, ७/१२, कृषी खात्याचा दाखला, जीएसटी बील, बँक तपशील, आधार कार्ड, हमीपत्र आदी कागदपत्रे अनुदान मागणीसाठी आवश्यक आहेत.
अधिक माहितीसाठी इच्छुक काजू उत्पादक शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य काजू मंडळाचे उपविभागीय कार्यालय, शांतीनगर, नाचणे, जि. रत्नागिरी यांच्याशी अथवा कृषी व्यवसाय पणन तज्ञ पवन बेर्डे (७२१८३५००५४) यांच्याशी संपर्क साधावा. अर्ज प्राप्त करणे तसेच जमा करण्याची सुविधा कुडाळ सुविधा केंद्र, MIDC कुडाळ, हापूस आंबा निर्यात सुविधा केंद्र, जामसंडे, ता. देवगड या ठिकाणी करण्यात आली आहे.



