मुख्य बातमी

रत्नागिरीत साकारणार ‘खगोलाचे गाव’

कोमल कुळकर्णी-कळंबटे
रत्नागिरी : गेल्या काही वर्षांचा विचार करता रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. विकेंडसाठी तर कोकणाला विशेष पसंती दिली जात आहे. येथील राहणीमान, खाद्यसंस्कृती, समुद्र किनारे, निसर्गसंपदा पर्यटकांना नेहमीच भुरळ घालते. त्याला आता खगोल पर्यटनाचीही जोड मिळणार असून, कोकणात असणाऱ्या सड्यांवरून हे निरभ्र आकाश न्याहाळता येणार आहे. भविष्यात येथे एखादे ‘खगोलाचे गाव’ साकारण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी रत्नागिरीपासून देवगडपर्यंत काही ठिकाणे निश्चित करण्यात आली असून, त्यात शहराजवळील आंबेशेत, ऊक्षी, गोळप, कोळंबे तसेच राजापूर तालुक्यातील जानशी, डोंगर, धारतळे, नाट्ये, आंबोळगाड यांचा समावेश आहे. हौशी खगोल अभ्यासक प्रा. बाबासाहेब सुतार आणि कर्ला येथील सुशेगाद जलविहारचे संजीव लिमये यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. जलविहार आणि आकाशदर्शन यांची सांगड घालत त्यांनी पर्यटकांसाठी पर्यटनाचे आणखी एक कवाड उघडे करून दिले आहे.
या विषयी गेली २० वर्षे या क्षेत्रात असलेले प्रा. सुतार यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी खगोल पर्यटनाचे अनेक पैलू उलगडले. ‘खरं तर कोकणात जलपर्यटनाची विपुल संधी उपलब्ध आहे. समुद्र किनाऱ्यालगतची गावे अजूनही आपला ग्रामीण बाज व संस्कृती टिकवून आहेत. या गावा-गावातील सुंदर मंदिरे व इतर ऐतिहासिक गोष्टी पर्यटनपूरक आहेत. हे असले तरी कोकणात विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत आकाश हे सुदैवाने अजूनतरी प्रदूषणविरहित आहे. कोकणातील सड्ये अजूनही काळेभोर आकाश कवेत घेऊन हजारो चांदण्यांचे दर्शन उघड्या डोळ्यांनी घडवत आहेत. त्यामुळे कोकण ही खगोल पर्यटनासाठी मोठी उपलब्धी आहे.’
‘खगोलाचे गाव’ निर्माण करण्यासाठी इथले सड्ये हे उत्तम जागा असून येथून विस्तीर्ण आकाशाचे दर्शन उघड्या डोळ्यांनी होते. डिसेंबर ते फेब्रुवारी हा कालावधी यासाठी उत्तम आहे. मार्चनंतर ढगाळ वातावरणाचा अडथळा जाणवतो. सध्या रत्नागिरीपासून देवगडपर्यंत असे अनेक सड्ये आपल्याला बघायला मिळतील. या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाचे तंबू उभारून, छोटी लायब्ररी, दुर्बिण यांची सोय करता येऊ शकते. त्यासाठी या जवळच्या गावांतील तरुणांना खगोल पर्यटनासाठी आवश्यक असणारे योग्य ते प्रशिक्षण देण्याचीही तयारी आहे. कोकणात असलेल्या रिसॉर्ट्सनी विशेषतः प्रकाश प्रदूषणापासून (light polution) दूर असलेल्या रिसॉर्ट्सनी यासाठी पुढाकार घ्यायला हरकत नाही. आकाशदर्शनासाठी आवश्यक असणारी दुर्बिण उपलब्ध केली आणि तज्ज्ञ प्रशिक्षित मनुष्यबळ ठेवले, तर त्यांनाही पर्यटकांना खगोल पर्यटनाचा आनंद देता येईल. ज्यांना आकाशदर्शन करायची इच्छा आहे अशा पर्यटकांना सड्यावर येथे नेऊन आधी उघड्या डोळ्यांनी आणि नंतर दुर्बिणीतून ग्रह, ताऱ्यांची ओळख करून दिली जाईल. तसेच शर्मिष्ठा व सप्तर्षी यावरून ध्रुवतारा कसा ओळखावा, दिशा निश्चिती, याच दरम्यान आकाशात अवतीर्ण होणारे मृग तारकासमूह, मृग नक्षत्र, व्याधाची चांदणी, मेष, वृषभ, मिथुन आदी राशी, त्यात दडलेली अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, पुनर्वसु, आर्द्रा आदी नक्षत्रे तसेच फेब्रुवारीअखेर पूर्व क्षितिजावर उगवणारी भव्य सिंह राशी व मघा, फाल्गुनीचे तारे यांची माहिती घेता येईल. खगोल पर्यटनातून ज्ञान आणि मनोरंजन हे दोन्ही हेतू साध्य होत असून, यात पर्यटकांची अभिरुची वाढत असल्याचे निदर्शनास येत असल्याचे प्रा. सुतार यांनी संवाद साधताना सांगितले.
सुशेगाद जलविहारचे श्री. लिमये यांनी जलविहाराला आकाशदर्शनाची जोड देता येईल असा विचार करून २०१३ प्रथम जलविहार+आकाशदर्शन असा उपक्रम राबविल्याचे सांगितले. त्याला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. यात कोल्हापूर, दापोली आणि स्थानिक असे मिळून जवळपास ६० पर्यटक सहभागी झाले होते. त्यानंतर मात्र असे उपक्रम राबविणे काही कारणास्तव त्यांना शक्य झाले नाही. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच अशी सहल घडवून आणली. दोन तासांच्या जलविहारादरम्यान आकाशदर्शन करताना ग्रह, तारे, नक्षत्र यांची मनोरंजनात्मक माहिती घेण्यासाठी पर्यटकांची उत्सुकता शिगेला पोचत असल्याचे त्यांनी सांगितले. खगोल पर्यटन वाढीच्यादृष्टीने ‘सुशेगाद’द्वारे जलविहाराबरोबरच सुशेगाद हॉलिडे होम्स (कर्ला, रत्नागिरी) येथे दुर्बिणीतून आकाशदर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जलविहार न करता केवळ आकाशदर्शन करायचे असेल, तर या सुविधेचा लाभ पर्यटकांना घेता येईल, असे श्री. लिमये यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button