सेवानिवृत्त पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी छंद जोपासावा : पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी
निवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचारी कल्याणकारी असोसिएशनच्या पंचवार्षिक स्नेहमेळावा उत्साहात
रत्नागिरी : आपण अधिकारी असलो तरी सेवानिवृत्त कर्मचारी आहोत, त्यामुळे आपल्या सर्व समान आहोत, अशी भावना ठेवा. आपला गणवेश, पदाची झालर दूर ठेवल्यास आपण सर्वांशी मिळून मिसळून जगू शकतो. आपण प्रथम माणूस आहोत, हे लक्षात ठेवले पाहिजे. पोलीस अधीक्षक कार्यालय २४ तास खुले आहे. आपण कधी या. निवृत्तीनंतर आपण छंद जोपासा, गप्पा मारा, समाजसेवा, रुग्णसेवा करा, असे आवाहन पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले.

स्वयंवर मंगल कार्यालयात निवृत्त पोलिस अधिकारी, कर्मचारी कल्याणकारी असोसिएशनच्या पंचवार्षिक स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. या वेळी महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यांतून माजी पोलिस अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रार्थना, महाराष्ट्र गीत आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरवात झाली.
पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी म्हणाले, चांगले सहकारी शोधा. संध्याकाळची कंपनी नको. मॉर्निंग वॉक करणारे, लोकांची सेवा करणारे भजन, पूजन करणारे समूह शोधा. त्यात सक्रिय राहा. त्यासाठी हा मेळावा आवश्यक आहे. हे सर्व सहकारी चांगले आहे, संघटन मजबूत करा, असे आवाहनही धनंजय कुलकर्णी यांनी केले. मी संघटनेच्या सभासदांना नेहमी भेटत असतो, ही संघटना चांगले काम करत आहे.

मेळाव्यास कार्याध्यक्ष सुखानंद साब्दे, जनसंपर्क अधिकारी श्रीराम गोरे, डॉ. अलिमियॉं परकार, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर सावंत, असोसिएशनचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष वसंतराव चव्हाण, उपविभागीय पोलिस अधिकारी भागोजी आवटी, नवी मुंबई अध्यक्ष विनोद चव्हाण, मुंबईचे मुख्य सचिव विजय चव्हाण, रत्नागिरीचे मुख्य सल्लागार अरविंद सावंत, सिंधुदुर्गचे सचिव गोविंद वारंग, कार्याध्यक्ष अर्जुन राणे, पुणे माजी उपायुक्त श्री. राजहंस, सचिव शिरीष सासणे उपस्थित होते. सूत्रसंचालन कार्याध्यक्ष अर्जुन राणे यांनी केले. कार्यक्रमाला मदत करणारे नॅशनल मेडिकल्सचे श्री. जैन यांचा सत्कार या वेळी करण्यात आला. जिल्हाध्यक्ष वसंत चव्हाण यांनी मान्यवरांचे स्वागत, सत्कार केले. प्रास्ताविकामध्ये त्यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला.

पोलिसांसाठी कल्याणकारी योजना
सुखानंद साब्दे यांनी सेवानिवृत्त पोलिसांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली. आयुष्मान कार्ड काढा. आयुर्विमा आवश्यक आहे. सर्वांमध्ये मिळून मिसळून जगा. पूर्वी पोलिस कर्मचारी आत्महत्या कधीही करत नव्हते, माणुसकी जीवंत होती. परंतु हल्ली आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळेच मी शासनाकडे किती जणांनी आत्महत्या केली, याची माहिती अधिकारात माहिती मागवली आहे व शासन काय करत आहे, असे विचारले आहे, असे सांगितले.
तंदुरुस्तीसाठी टिप्स
डॉ. अलिमियॉं परकार यांनी सर्वांना तब्बेत तंदुरुस्त राहण्यासाठी काय करायला हवे त्याच्या टीप्स दिल्या. मी तरुण डॉक्टर असताना मला पोलिस अधीक्षक ए. के. सिंग यांनी पाय गरम, पोट नरम आणि डोकं थंड असा संदेश एका कार्यक्रमात दिला. त्यामुळेच आज मी याही वयात दिवसाचे ८ तास रुग्ण तपासणी करतो, असे सांगितले.



