पुतळ्यांच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याची मागणी

रत्नागिरी : शहरातील राष्ट्रपुरुष, देवांच्या पुतळ्यांना सुरक्षिततेसाठी त्या परिसरात सीसीटीव्ही बसवण्याची मागणी धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते तन्मय दत्तात्रय दाते यांनी केली आहे.
रत्नागिरी शहराची वाढ झपाट्याने सुरू आहे. विविध विकासकामांसह शहरात नवनव्या इमारती उभ्या राहत आहेत. शहरात राष्ट्रीय महापुरुषांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. रत्नागिरी शहरात काही पुतळे जुने असून काही नव्याने उभारण्यात आले आहेत. हे पुतळे शहरासाठी भूषण असून शहराचे सौंदर्य वाढवण्यासाठी महत्त्वाचे आहेत; परंतु तेथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या उद्देशाने सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही बसवण्यात यावेत, अशी मागणी येथे जागरुक नागरिक तन्मय दत्तात्रय दाते यांनी केली आहे. रत्नागिरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्याकडे यासंदर्भातील निवेदन तन्मय दाते यांनी सोमवारी ( ८ जुलै) दिले.
तन्मय दाते हे सामाजिक काम करत आहेत. रत्नागिरी शहरातील विविध विषयांवरील प्रश्न ते मांडत असून नागरिकांनी कोणत्या समस्या असल्यास त्या निदर्शनास आणून द्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले आहे.



