मुख्य बातमी

गणेशोत्सव काळात सुरक्षिततेच्या कारणासाठी मंडळांना अधिकृत वीज जोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन

देवरूख : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडने या वर्षीच्या गणेशोत्सवादरम्यान गणेश मंडळांना तात्पुरती नवीन वीज जोडणी देण्याचे जाहीर केले आहे. ही वीज जोडणी घरगुती दरात आकारली जाणार आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेश उत्सवादरम्यान शॉर्ट सर्किट किंवा इलेक्ट्रिकल वायरिंग बिघाडांचे धोके टाळण्यासाठी महावितरणची अधिकृत तात्पुरती वीज जोडणी घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

उत्सवादरम्यान पाऊस पडण्याची शक्यता असल्याने संभाव्य धोके टाळण्यासाठी वीज यंत्रणेची योग्य काळजी घ्यावी. मंडप आणि प्रकाशासाठी विद्युत व्यवस्था आणि सेटअप अधिकृत विद्युत कंत्राटदारांनीच केलेले हवे. गणेश मंडपातील विद्युत यंत्रणेचे अर्थिंग सुस्थितीत असल्याची खात्री करावी, असे निर्देश दिले आहेत. मंडपाच्या आतील तारांचे इन्सुलेशन खराब झाल्यास, अशा तारांमधून विद्युत प्रवाह धातूच्या पत्र्यात किंवा ओल्या वस्तूंमध्ये जाऊ शकतो. हे टाळण्यासाठी, तारांना योग्य प्रकारे इन्सुलेशन केले पाहिजे किंवा कनेक्शन योग्य इन्सुलेशन टेपने झाकलेले असावे. स्विचबोर्डच्या मागे प्लायवुड किंवा लाकडी बोर्ड ठेवण्याची खात्री करा.

कमी दाबाच्या आणि उच्च दाबाच्या वीजवाहिन्या, ट्रान्सफॉर्मर, फीडर पिलर आणि इतर यंत्रणांना गणेशोत्सवाच्या सजावटीमध्ये किंवा मिरवणुकीत स्पर्श होणार नाही, याचीही काळजी घ्यावी. गणेश मंडळांनी विनापरवाना वीज वापरल्यास २००३ च्या विद्युत कायदा अंतर्गत कारवाई केली जाईल. गणेश उत्सवादरम्यान वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र कनेक्शन असणे आवश्यक आहे. वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरू केल्यास, शेअर्ड न्यूट्रलमुळे जनरेटरमधून विद्युत प्रवाह लो-व्होल्टेज लाइनमध्ये वाहू शकतो, ज्यामुळे जीवघेणा अपघाताचा धोका असतो. सततच्या पावसामुळे आणि जोरदार वाऱ्यामुळे मंडपासह सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या दिवाबत्तीच्या तारा निखळत नाहीत किंवा विस्कळीत होणार नाहीत याची दैनंदिन तपासणी करावी, असे महावितरणतर्फे सांगण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button