चौथी-सातवीच्या विद्यार्थ्यांसाठीही शिष्यवृत्ती परीक्षा; शिक्षण विभागाचा निर्णय!

पुणे : शालेय शिक्षण विभागाच्या वतीने सन २०२५-२६ या चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवी आणि आठवीबरोबर चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठीही शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहे.
शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण व्हावी यासाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. अनेक शाळांमधील शिक्षक शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची तयारीही करून घेतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या काही शाळांमधील चौथी व सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी मिळत नव्हती.
काही शिक्षक संघटनांनी चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याची मागणी केली होती. त्याबाबतचा प्रस्तावही शासनाकडे सादर करण्यात आला आहे. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी चौथी व सातवीच्या वर्गासाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचे घोषित केले आहे.ग्रामीण भागात बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्था व सरकारी शाळा या चौथी अथवा सातवीपर्यंत आहेत. त्यामुळे या शाळांमधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा देता येत नव्हती. विद्यार्थी, पालकांसह शाळांना याचा मोठा फटका बसत होता.



